कोकण रेल्वे 'ठप्प'मागे मानवी चूक!

20/06/2011 11:51

 

तुफान पावसामुळे कोकण रेल्वेच्या पोमेंडीजवळ कोसळलेल्या भिंतीचे ढिगारे उचलण्यात यश आले असून , त्यामुळे कोकण रेल्वेची सेवा रुळावर आली आहे . पावसाने दोन दिवस विश्रांती घेतल्यामुळे हे अडथळे दूर करण्यात यश आले . दरम्यान, रेल्वेमार्गावर संरक्षक भिंत कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती नव्हे तर रेल्वेच्या तंत्रज्ञानाची फार मोठी मानवी चूक असल्याचा आरोप केला जात आहे .

कोकणात पावसाचा जोर असताना शुक्रवारी पोमेंडीजवळची अवाढव्य भिंत रेल्वेमार्गांवरच कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीस ब्रेक लागला होता . मातीचे ढिगारे उचलण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले . हे काम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर रविवारी सकाळी रेल्वे सुरळीत धावू लागली . पोमेंडीजवळ नवीन ट्रॅक टाकून त्याची रात्री चाचणी घेण्यात आली . ती यशस्वी ठरल्यावर सकाळी दहाच्या सुमारास मडगाव - मुंबई गाडी ताशी १० किमी वेगाने नेण्यात आली . रुळावर ६० मीटरची संरक्षक भिंत कोसळल्याने मार्ग ४८ तासांपेक्षा अधिक काळ बंद राहिला होता .

नैसर्गिक आपत्ती नव्हे , मानवी चूक
रेल्वेमार्गावर संरक्षक भिंत कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती नव्हे तर रेल्वेच्या तंत्रज्ञानाची फार मोठी मानवी चूक असल्याचा आरोप केला जात आहे . मार्गाच्या दुतर्फा घातलेल्या सिमेंटच्या पंधरा फुटांच्या संरक्षक भिंतीला पायाच नव्हता , काँक्रीटचे तुकडे लावण्यात आले होते , त्यामध्ये स्टील कुठे गेले , असा संतप्त सवाल कोकणवासी करत आहेत . यावेळी ताशी ३ , ००० रुपये दराने २१ पोकलेन मशीन्स ४७ तास काम करत होती . रेल्वेच्या मानवी चुकीचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याबाबत मौन बाळगण्यात येत आहे .

कोकण रेल्वेने या मार्गाला असलेला उक्षी ते लांजा हा पूर्वीचा प्रस्तावित बायपास का गुंडाळला , असा सवालही करण्यात येत आहे . या प्रस्तावित बायपासमुळे रत्नागिरी स्टेशन बाजूला पडले , तरी त्यामुळे दरवर्षी निर्माण होणारा पेच सुटेल , याकडे लक्ष वेधले जात आहे . सध्याच्या घडीला पोमेंडी रेल्वेमार्गाजवळचा अख्खा डोंगर सपाट करणे हाच एकमेव उपाय रेल्वेपुढे असून हे काम भौगेलिकदृष्ट्या अवघड आहे . हा डोंगर कापला नाही , तर पोमेंडी रेल्वेमार्ग प्रवासी गाड्यांना कायमचा धोकादायक ठरणार असून दर पावसाळ्यात कोकण रेल्वे ठप्प होण्याचा धोका आहे .

विलवडेनजिकचा डोंगर धोकादायक
निवसरच्या पुढे विलवडे स्टेशनजवळील एका डोंगराचीही पावसाळ्यापूर्वी तब्बल ५० मीटरची कटाई केली होती . गेल्या आठवड्यातील पावसाने या डोंगरालाही भेगा पडल्या असून तेथे दुर्घटना होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत .


solapur pune pravasi sangatana