महाराष्ट्र राज्याची निर्मिती

ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.

अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.

भौगोलिक स्थान

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (होमोजीनीयस) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.

प्रशासन

भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.

महाराष्ट्रात दोन विधान-सदने (बिकमेल) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉँग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. सध्या (इ.स. २०११)महाराष्ट्रात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीची सत्ता असून पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उप-मुख्यमंत्री आहेत.

विभाग

महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , औरंगाबाद , कोकण , नागपूर व अमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.

भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग).

अर्थव्यवस्था

सन १९७० नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले.आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे.

राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारतातील दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.

एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (गष्डप) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो.

    महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलीयम आणि तत्सम उद्योग हे आहेत.

    इतर महत्त्वाचे उद्योगधंदे - धातू उत्पादने, वाईन द्राक्षापासून तयार केले जाणारे मद्य), दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स.

    महत्त्वाची पिके- आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये.

    महत्त्वाची नगदी पिके (कॅश क्रॉप्स)- शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू.

सिंचीत जमीन ३३,५०० कि.मी२ इतकी आहे.

मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बँका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई आहे. मुंबई शेअर बाजार (भारतातील सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत.

कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त स&प क्नक्ष 500 कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत.

लोकजीवन

महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २००१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९,६७,५२,२४७ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुसर्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणार्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३२२.५/१ कि.मी.२ इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.०३ कोटी पुरुष व ४.६४ कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (सेक्स-रेशियो) १,००० पुरुषांमागे ९२२ महिला इतका आहे. ७७.२७% (पु-८६.२%, स्त्रि-६७.५%) लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर हिंदी भाषा व इंग्लिश शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'व-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.

राज्यात ८०.२% हिंदू, १०.६% मुस्लिम, ६% बौद्ध, १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.

संस्कृती

महाराष्ट्रातील काही मंदीरे अनेक शतकांपासूनची आहेत. मंदीरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदीरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबाद जवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे.

महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारतातील अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी'चे रचयिते), पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति - पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीतनाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.
त्र्यंबकेश्वर, नाशिक

मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - दूरदर्शन-सह्याद्री, झी मराठी,ई टीवी मराठी स्टार माझा़ , मी मराठी , झी टॉकिज, झी २४ तास,आयबीएन-लोकमत आणि साम मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात.

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.
गणेशोत्सव

मराठी स्त्रियांचा पारंपारिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.

भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डी सुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.

दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणार्‍या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात.

स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारनांची व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातुनच सुरु झाली. तत्कालीन समाजसुधारकांचे अग्रणी महात्मा ज्योतीबा फुले हे होते.

हवामान

राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पुर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतुच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.

वाहतूक व्यवस्था

भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. सध्या मुंबई शहरात मोनोरेल व पुणे शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी गाड्यादेखील सेवा पुरवतात.

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे. नागपूर व पुणे विमानतळांवरुन देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात. औरंगाबाद, रत्‍नागिरी, कोल्हापूर व सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई-नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई, न्हावा-शेवा व रत्‍नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत.

मुख्य शहरे

  •     मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारताच्या विविध भागांतून लोक रोजगारासाठी मुंबईत मोठ्या संख्येने येतात.
  •     पुणे - शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. शिक्षण आणि संशोधनसंस्था येथे मोठ्या संख्येने आहेत. पुणे शहर परिसरात आधुनिक उद्योगव्यवसाय मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतातील आघाडीचे शहर असा लौकिक पुण्याने मिळवला आहे.
  •     नागपूर - विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.
  •     औरंगाबाद - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या औरंगाबाद परिसरात मोठी आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.
  •     नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहुर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
  •     कोल्हापूर- शिवकालापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे.
  •     सोलापूर- दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. अस्ताला गेलेल्या कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध. येथिल सिद्धेश्वराचे मंदिर प्रसिद्ध.

solapur pune pravasi sangatana