परशुराम क्षेत्र

परशुराम क्षेत्र हे कोकणातील सर्वात महत्त्वाचे व महाराष्ट्रात प्रसिद्ध असे देवालय आहे. परशुराम किंवा भार्गवराम हे कोकणस्थ ब्राह्मणांचे दैवत आहे. परशुराम हे श्रीविष्णूचा सहावा अवतार असून त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करण्याचा पराक्रम केला व त्यानंतर पृथ्वीचे कश्यप ऋषींना दान केले.
परशुराम हा विष्णूच्या दशावतारापैकी चिरंजीव अवतार समजला जातो. अंशात्मक रीत्या परशुरामाचे वास्तव्य चिपळूण जवळील महेंद्र पर्वतावर आहे असा भक्तांचा समज आहे. परशुराम क्षेत्र चिपळूणपासून चार किलोमीटर अंतरावर डोंगरावर आहे.
या देवळाचा इतिहास, यात्रा व जत्रा सर्वधर्मसमभावाचे द्योतक आहे. विजापूरच्या आदिलशहाने मुसलमान असूनही या देवळाच्या बांधणीसाठी खर्च केला.

 

वास्तुस्थापत्यात्मक वैशिष्ट्ये

या देवळाच्या घुमटांचा आकार व मांडणी आदिलशाही काळात झाल्यामुळे त्याची शैली वेगळीच आहे. शिखरावर मोठे कलश असून त्याखाली उतरत जाणारे अष्टकोनी अर्धगोलाकार घुमट व नंतर कंगोऱ्याची घुमटाची कडा असून त्याखालचा चौथरा अष्टकोनी आहे. घुमटांत चार दिशांना झरोके असून घुमटाभोवती चार टोकांना लहान छत्रीवजा आकार आहेत. प्राकाराच्या दगडी भिंती व कमानींमध्ये हिंदू व मुसलमानी वास्तुकलेचा संगम दिसून येतो. वास्तुशैलीवर येथील जांभा दगड, लाकूडकाम, व जोरदार पाऊस यांचा परिणाम झालेला दिसतो.
घुमटांचा अंतर्भाग व आतील लाकडी कोरीवकाम खास कलेचा नमुना आहे. तिसऱ्या घुमटाला वेगला इतिहास आहे. धर्मच्छल करणाऱ्या जंजिऱ्याच्या सिद्दीच्या मुलीने हा घुमट बांधला. तिचा नवरा गलबतासह समुद्रावर बेपत्ता असता, श्री ब्रम्हेंद्रस्वामी या छत्रपती शाहू व पेशवे यांच्या गुरूंच्या सांगण्यावरून तिने नवस केला. पती परत आल्यावर विश्वास बसून तिने घुमट बांधला व दररोज चौघडा वाजविण्यासाठी नेमणूक करून दिली. ती आजही चालू आहे.
गाभाऱ्यांत काम, परशुराम व काल यांच्या मूर्ती आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे ते अवतार होत. काळ ही मृत्युदेवता आहे. परशुरामांनी मृत्यूला जिंकले व वासनारहित होऊन कामासही जिंकले म्हणून ही प्रतीके येथे स्थापिली आहेत.

 

उत्सव व प्रघात

मुख्य अक्षय तृतीयेचा (परशुराम जयंतीचा) असतो. या सर्व सोहळ्यास येणारी माणसे, केले जाणारे उपचार, वागणे यामुळे खास कोकणातील वातावरण निर्मिती होते. हा उत्सव वैशाख शुद्ध प्रतिपदा, द्वितीया व तृतीया असा तीन दिवस असतो. जन्मकाळ तृतीयेचे सायंकाळी दिवस मावळल्यावर होतो. पारंपारिक पद्धतीचे रंगीत कागद, बेगड, बांबू कापड, पुठ्ठे वगैरे वापरून गणपतीच्या देवळासमोर सुंदर मखर व मांडव केला जातो. मंडपाला छत लावतात. या मंडपात कीर्तने गाण्याचे कार्यक्रम, जन्मकाळ, लळीत, भजने असे कार्यक्रम होतात. गावातील प्रत्येक माणसाला प्रसादाचा नारळ वाटण्यात येतो.
देवळाच्या प्राकाराबाहेर देवाची बाग आहे. त्यांत एक तोफ आहे व रोज दोनदा आवाज काढण्याची पद्धत होती. याला परशुरामाचे भांडे वाजले असे म्हणतात. देवाची त्रिकाळ पूजा होते. प्राकारात रेणुका, गणपती, बाणगंगा तलाव, गंगेचे देऊळ या सर्व वास्तूंच्या परिसरात जांभ्या दगडाच्या लाद्यांनी व त्यांच्या वास्तुस्थापत्यामुळे सतराव्या शतकातील वास्तुस्थापत्याची प्रचीती येते. रेणुका मंदिरात व इतरत्र असलेले कोरीवकाम, लाकूडकाम यावर प्रादेशिक कुणबी कलेची छाप दिसते. लाल कौलारू छपरे, हिरवी गर्द झाडी, लाल माती, लाल जांभळट जांभ्या दगडाच्या भिंती व जमिनी यामुळे संपूर्ण परशुराम क्षेत्रासच निसर्गसंतुलनाचा व सौंदर्याचा वरदहस्त लाभला आहे याची प्रचीती येते.
मार्गशीर्ष वद्य एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी पंढरपूरचा विठोबा येथे असतो असा दृष्टांत सुमारे शंभर वर्षापूर्वी एका पंढरीच्या वारकऱ्यास झाला. या यात्रेला अनेक यात्रेकरू येतात व सात दिवस नामसप्ताह करतात. येथे महाशिवरात्रीचाही उत्सव होतो. भाविक हिंदू मने देवापासून दूर असल्यास आपला देव कोठेही कल्पून त्याची पूजा करतात. विठ्ठलाकडे नाही पोहोचता आले तर कोकणातच विठ्ठल येतो व त्याची पूजा होते. हे हिंदू मनोवृतीचे वैशिष्ट्य आहे.
हे देवस्थान जागृत असल्यामुळे पुष्कळ भाविक लोक येथे दर्शनास येऊन नवस करतात व परत येऊन नवस फेडतात

solapur pune pravasi sangatana
Create a free website Webnode